Tuesday, March 12, 2013

रामूने घडवलेला '26/11'

मृतांच्या टाळुवरचे लोणी खाणे, या वाक्यप्रचाराची प्रचिती गेल्या शुक्रवारी पुन्हा एकदा आली

‘द अटॅक्स ऑफ 26/112 नावाचा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र रिलीज झाला. रामगोपाल वर्मा नावाच्या बॉलिवूडमधील तथाकथित ग्रेट दिग्दर्शकाच्या ‘फॅक्टरी’तील हे आणखी एक प्रॉडक्ट. मुंबईवर झालेल्या ‘26/112 च्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर म्हणजे सत्यघटनेवर आधारित असा हा सिनेमा आहे. हा चित्रपट चांगला की वाईट, याचे स्टार द्यायला आम्ही काही चित्रपट समीक्षक नाही. परंतु सामान्य मुंबईकर म्हणून ‘26/112 ची जखम कायमची आमच्या मनामध्ये भळभळत राहणार आहे. या हल्ल्याच्या कटातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याला गेल्या नोव्हेंबरमध्ये फाशी देण्यात आली, तेव्हा मुंबईकर म्हणून झालेला आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही. जे निरपराध लोक या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले, जे धाडसी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले, ते काही परत येणार नाहीत. मात्र असे नीच कृत्य करणार्या दहशतवाद्यांना माफी नाही, हे कायद्याच्या कसोटीवर सिद्ध झाले, म्हणून तो आनंद होता.

मुंबईकरांच्या दृष्टीने अशा भावनिक आणि संवेदनशील विषयावर तद्दन गल्लेभरू चित्रपट काढणारा रामगोपाल वर्मा व्यावसायिक गणिते मांडून चित्रपट काढतो, तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. ‘26/112 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर हाच रामगोपाल वर्मा तत्कालिन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यासोबत हॉटेल ताजची ‘व्हिजिट’ करायला गेला होता. त्यावरून टीका झाल्यानंतर आपण त्या विषयावर चित्रपट काढणार नाही, असे वक्तव्य याच रामूने केले होते. आता रामू म्हणजे काय सत्यवचनी भगवान श्रीराम थोडाच आहे त्याने करोडोंचा धंदा डोक्यात ठेवून हा चित्रपट तयार केला. रामू निलाजरा आहेच, मात्र अशा बाजारू चित्रपटामध्ये मराठी माणसांचा आवडता हिरो असलेला नाना पाटेकरसारखा अस्सल कलाकार काम करतो, तेव्हा संतापाने अंगाची लाही लाही होते. एरव्ही संवेदनशील प्रश्नांवर आमच्या राजकारण्यांनाही खडे खडे दोन-चार ‘प्रहार’ करणारा नाना आम्हाला आवडतो. तोच नाना पाटेकर जेव्हा रामूच्या सिनेमाचा पार्ट बनतो, तेव्हा त्याच्या सचोटीबद्दल शंका यायला लागते. टीव्ही चॅनेल्सवरील चर्चात्मक कार्यक्रमांमध्ये पोटतिडकीने ‘विचार’ मांडणारा ‘नटरंग’फेम अतुल कुलकर्णी जेव्हा या सिनेमात काम करतो, तेव्हा याने अक्कलखाते गहाण ठेवलेय की काय, असे वाटू लागते.

आता चित्रपटांचे आविष्कारस्वातंत्र्य वगैरे नेहमीचे बुद्धीवादी तत्त्वज्ञान वगैरे कुणायला मांडायचे असेल, तर खुशाल मांडा. परंतु रामूचा सिनेमा हा केवळ बाजारूपणा आहे, यात काडीमात्र शंका नाही. ‘26/112 ची इत्यंभूत वस्तुस्थिती स्पष्ट करणारी अनेक पुस्तके लिहिली गेलीत, अनेक लघुपट, माहितीपट निर्माण झाले आहेत. मग त्यावर पुन्हा वेगळा व्यावसायिक सिनेमा काढण्याची खरंच गरज होती का? रामूने इतरांना माहिती नसलेला असा कोणता नवा पैलू सिनेमात दाखवला आहे..? या प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशीच असावीत.

चांगले एकाच गोष्टीचे वाटते ते म्हणजे मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणार्या रामूला मुंबईकर प्रेक्षकांनी त्याची जागा दाखवून दिलीय. पहिल्या दोन दिवसात या सिनेमाला केवळ 3.15 कोटी रूपयांचा गल्ला जमा करता आला. रामूचा धंदा चांगलाच आपटला, निदान एवढे समाधान तरी त्यावरून मिळते.

- सुनील घुमे

No comments:

Post a Comment