Friday, March 8, 2013

मुंबई माझी 'बेवडी'

थर्टी फर्स्ट म्हणजे मुंबईकरांचा जणू राष्ट्रीय सणच गणेशोत्सव, दांडिया, दहिहंडी, रंगपंचमी, गटारी आणि त्याच रांगेतला थर्टी फर्स्ट. वर्षाच्या अखेरच्या डिसेंबर महिन्याचा अखेरचा दिवस. दारू रिचवल्याशिवाय आणि पार्टीचा धिंगाणा घातल्याशिवाय आम्हा मुंबईकरांचे नवीन वर्ष जणू उजाडतच नाही.

खरे तर यंदाच्या थर्टी फर्स्टवर दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणाचे गडद सावट होते. धावत्या बसमध्ये एका 23 वर्षीय तरूणीवर सहा नराधमांनी केलेला पाशवी बलात्कार आणि त्यानंतर तिच्यावर केलेले शारिरीक अत्याचार यामुळे देशभरातील तरूणाईच्या संतापाचा स्फोट झाला. त्यामुळे यंदा थर्टी फर्स्ट साजराच करू नये, अशा मूडमध्ये तरूणाई होती. खरे तर थर्टी फर्स्टच्या निमित्ताने पहाटे 5 वाजेपर्यंत बार, पब्ज, हॉटेल्स आणि दुकाने उघडी राहतील, असा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केला होता. परिणामी यंदाच्या थर्टी फर्स्टला दारूचे पाट वाहतील, असे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात गेल्या सोमवारी मध्यरात्री थर्टी फर्स्टचा जोश निदान मुंबईत तरी जाणवलाच नाही. रस्त्यांवर, चौपाटयांवर लोक होते, मात्र माहौल नव्हता. एकतर दिल्लीतील घटनेचे सावट, सध्या सुरू असलेला मार्गशीर्ष महिना आणि त्यात मंगळवारी 1 जानेवारीच्याच मुहूर्तावर आलेली अंगारकी चतुर्थी. कधी नव्हे ते थर्टी फर्स्टच्या रात्री तरूणाई अनवाणी पायांनी श्री गणेशाचे स्मरण करत प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिराच्या दिशेने जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सोमरसापेक्षा भक्तीरसामध्ये मुंबईकर बुडाले होते. दारूच्या दुकानाबाहेर दिसणारी गर्दी सिद्धीविनायक मंदिरासमोर दिसली.

मात्र हे सगळे घडत असले तरी या सगळ्याशी काहीच संबंध नसलेला एक वर्ग मुंबईत राहतो. दिल्लीत बलात्कार होवोत, राजकीय उलथापालथ होवो, भूकंप, पूर किंवा दुष्काळासारखी नैसर्गिक आपत्ती येवो किंवा जातीय दंगलींचे थैमान उसळो, या सर्वांशी काहीच देणेघेणे नसलेली कथित उच्चभ्रू, हाय सोसायटी या मुंबईतच (सॉरी ’बॉम्बे’मध्येच) राहते. त्यामुळेच यंदा थर्टी फर्स्टचा जल्लोष दरवर्षीपेक्षा कमी असला तरीही दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालणार्या तळीरामांची संख्या अजिबात कमी झालेली नव्हती. उलट गेल्या वर्षीपेक्षा अधिक वाढली होती. दारू पिऊन वाहने चालवू नयेत आणि अपघातासारख्या घटना घडू नयेत, यासाठी मुंबई पोलिसांनी ’डोन्ट ड्रिंक अँड ड्राइव’ मोहीम राबवली. तरीही थर्टी फर्स्टच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवणारे 848 तळीराम पोलिसांना सापडले. त्याआधीच्या वर्षीच्या 739 तळीरामांच्या तुलनेत हे प्रमाण कितीतरी अधिक आहे. म्हणजेच सेलिब्रेशनचा जल्लोष कमी असला तरी बेवडयांची संख्या मुळीच कमी झालेली नाही. ही खरोखरच दुर्दैवी आणि चिंतेची बाब आहे. नशीब एकच की, त्यांच्या या कथित ङ्गसेलिब्रेशनफला गालबोट लावणारी एकही दुर्घटना मुंबईत घडली नाही. ना मोठा अपघात, ना महिलांवरील अत्याचार. किरकोळ छेडछाडीच्या काही तक्रारी पोलिसांकडे आल्या, मात्र त्या अगदीच तुरळक होत्या.

अर्थात त्याचे श्रेय द्यावे लागेल ते मुंबई पोलिसांना जवळपास अख्खे पोलीस दल थर्टी फर्स्टच्या रात्री मुंबईच्या रस्त्यावर होते. नाक्यानाक्यावर नाकाबंदी आणि पोलीस बंदोबस्त दिसत होता. त्यामुळेच 2013 ची सुरूवात निर्विघ्न आणि शांततेत झाली.

थँक्स मुंबई पोलीस...
.............

थर्टी फर्स्ट ड्रिंक ऍन्ड ड्राइव्ह

दंडात्मक कारवाई - 840
मद्यपी गतवर्षीची संख्या - 739
मद्यपी एकूण दंडवसुली - 16,96,000 रू.
पूर्व उपनगर - 277 मद्यपी
पश्चिम उपनगर - 181 मद्यपी
मध्य उपनगर - 118 मद्यपी
दक्षिण मुंबई - 96 मद्यपी

- सुनील घुमे

No comments:

Post a Comment