Friday, March 8, 2013

येवा… कोकण 'विकणे' आहे!

'येवा कोकण आपलाच असा’ ही कॅचलाइन मालवणी नाट्यसम्राट मच्छिंद्र कांबळींनी हिट केली. ती एवढी परफेक्ट होती की, अमराठी माणसांनी कोकणात येण्याचा सपाटाच लावला. इथल्या जमिनी, आंबा-काजू-नारळीच्या बागा विकत घेण्याचा धडाकाच त्यांनी लावला. अगदी तळकोकणापासून रायगडातल्या अलिबागपर्यंत ज्यांच्याकडे बक्कळ पैसा होता, तोही काळा पैसा, त्यांनी तो कोकणाच्या लाल मातीत गुंतवला आणि पांढरा केला.

ही पार्श्वभूमी सांगायचे कारण म्हणजे गेल्याच आठवडयात मुंबईत पार पडलेला ग्लोबल कोकण फेस्टीव्हल अशाप्रकारचा फेस्टीव्हल साजरा होण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. कोकणाला जगात प्रमोट करण्याच्या नावाने दरवर्षी कोकण ’भूमी’ प्रतिष्ठानच्या वतीने हा इव्हेंट आयोजित केला जातो. गेल्यावर्षी वांद्रे-कुर्ला संकुलात हा फेस्टिव्हल झाला आणि यंदा गोरेगावच्या नेस्को संकुलात. सनदी अधिकारी असताना द. म. सुकथनकर यांना कोकणाचा विकास करण्यासाठी किती योजना राबवल्या, त्यांचे त्यांनाच माहिती परंतु यादवराव यांच्या रूपाने त्यांना दूरदृष्टी लाभलेला ’संजय’ भेटला आणि हा फेस्टिव्हल ग्लोबल झाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उद्घाटक. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांचा सहभाग. शिवसेना-भाजपच्या नेत्यांची उपस्थिती. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भेट. आता एवढे मोठे राजकीय गॅटमॅट जमवल्यानंतर हा फेस्टीव्हल भव्य-दिव्य झाला नसता तरच नवल.

परंतु ज्यांनी या महोत्सवाला भेट दिली, त्यांच्या पदरी मात्र निराशाच पडली. उलट कोकणच्या विकासाच्या नावाखाली हे ग्लोबल महोत्सववाले जे काही दाखवत होते, त्यामुळे सज्ञानी कोकणी माणसाच्या काळजाचा ठोकाच चुकला. महोत्सव वगैरे सर्व झूठ खरे तर हे ग्रँड प्रॉपर्टी एक्झिबिशनच होते. कोकणातील जमिनी कवडीमोल भावाने बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा ग्लोबल राजकीय डाव आहे, हे त्यातून जाणवले. ज्यांच्या नावातच ’भूमी’ आहे, ते जमिनींचाच तर व्यवहार करणार

युटोपिया समूह या फेस्टीव्हलचा मुख्य प्रायोजक होता. या युटोपियावाल्यांनी गणपतीपुळ्याजवळ मोठी जागा विकत घेतली आहे. फाइव्ह स्टार हॉटेल, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, गोल्फ क्लब, क्रिकेट ग्राऊंड, आणखी काय काय स्वप्ने ते दाखवतायत. प्रतिलवासाच जणू उभा करायचाय त्यांना. त्याशिवाय निर्माण रिएल्टर्स, माद रिएल्टर्स, मामाचा गाव उभारणारा मैत्रेय ग्रुप, न्यू मॅक्स डेव्हलपर्स, मानगिरीश इस्टेट, मोरया इन्फ्रास्ट्रक्चर, पॅरेडाइज ग्रुप, एमसीएचआय क्रेडई, अग्रवाल रिएल्टीज, स्वराज बिल्डर्स, मेफेयर हाऊसिंग हुश्श... दम लागला या बिल्डर प्रायोजकांची नावे सांगताना. हे म्हणे कोकणाला ग्लोबल बनवणार आहेत. कोकणात पैसा यायला हवा, लोकांनी गुंतवणूक करायला हवी, मान्य. परंतु सगळे बिल्डरच जमिनी घेण्यासाठी येणार असतील तर कोणता विकास आपण साधणार आहोत? आज पुण्याच्या आसपासचा निसर्गरम्य भाग जसा कॉंक्रिटचे जंगल झाला तसेच आता रत्नागिरी, चिपळूण, लांजा, सिंधुदुर्ग या शहरांच्या परिघातील गावांचे होत आहे.

त्यात कोकणच्या सौंदर्याचा बळी जाणार हे वेगळे सांगायला नकोच. कोकणात पैसा यायला हवा पण उद्योगातून. छोटया छोट्या कंपन्या, कॉल सेंटर्स, पर्यटन उद्योग इथे यायला हवेत. त्यांच्यासाठी घरे बांधली जावीत. सेकंड होमसाठी येणा-यांची व्यवस्था म्हणजे विकास नव्हे. छोटया उद्योगांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. रस्ते, वीज, इंटरनेट व्यवस्थित पाहिजे. त्यात पैसे गुंतवले पाहिजे. पण ग्लोबल कोकणात ते राहिले बाजूला म्हणून आता कॅचलाइन बदलायला हवी.

येवा, कोकण विकणे आहे अशी ती करावी, म्हणजे ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखे होणार नाही.

- सुनील घुमे

No comments:

Post a Comment